

सोलापूर : पावसाळ्याच्या ऑगस्ट महिन्यात सोलापूरकरांना उन्हाच्या चटक्याचा सामना करावा लागत आहे. सोलापुरच्या तापमानात पुन्हा वाढ झाली असून गुरुवारी कमाल तापमान ३५.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने ऑक्टोबर हिटचा तडका जाणवत आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
ऑगस्ट महिन्यात साधारणपणे ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी अपेक्षित असतात. मात्र, यंदा सोलापूर जिल्ह्यात पावसात मोठा खंड पडत असून अनेक भागांत उन्हाचा कडाका जाणवत आहे. तापमान वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवरही उन्हाची तीव्रता जाणवत आहे.
तापमान वाढ आणि पावसातील खंड यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असून पिकांना पाण्याची गरज भासत आहे. आगामी काही दिवसांत हलक्या सरींची शक्यता असली तरी मोठ्या पावसाची खात्री नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले. ऑगस्टमध्येच ऑक्टोबरसारखा उन्हाचा तडका जाणवत असल्याने सोलापूरच्या हवामानातील बदलाची तीव्रता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
या तापवानवाढीमुळे पावसाची आशा धुसर झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी प्रचंड भरसणारा पाऊस यंदा मात्र, दडी मारून बसल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाऊस नसल्याने सणावराचे दिवस असूनही बाजारात मोठी मंदी जाणवत आहे. कोणत्याच किरकोळ तसेच घाऊक बाजारात उठाव नसल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.