मोहोळ : अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी तात्काळ धाव घेत हा विवाह रोखत १७ वर्षीय बालिकेला सुरक्षित ताब्यात घेतले. पोलिसांच्या या संवेदनशील व कर्तव्यनिष्ठ कार्यवाहीचे बालकल्याण समिती, सोलापूर यांच्या वतीने कौतुक करण्यात आले.
मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच मोहोळचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली API गणेश कोल्हाड, हेडकॉन्स्टेबल संतोष माने, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद माळी, पोलीस कॉन्स्टेबल धनाजी घोरपडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी गुंड यांच्या पथकाने तत्काळ कार्यवाही केली.
पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या संरक्षणाची व पुढील काळजीची कार्यवाही करण्यासाठी तिला बालकल्याण समिती, सोलापूर यांच्यासमोर सादर करण्यात आले. बालविवाह ही बालिकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि भवितव्यावर गंभीर परिणाम करणारी सामाजिक कुप्रथा आहे. अशा प्रकारची माहिती मिळताच विलंब न करता पोलिसांनी केलेली कार्यवाही ही निश्चितच कौतुकास्पद असल्याचे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष/सदस्यांनी नमूद केले.
बालविवाह रोखण्यासाठी मोहोळ पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता अनुकरणीय असून, या कार्यवाहीमुळे एका बालिकेचे बालपण आणि भवितव्य सुरक्षित करण्यास मदत झाली आहे, असेही समितीच्या वतीने सांगण्यात आले. या उत्कृष्ट कार्यवाहीबद्दल मोहोळ पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांचे बालकल्याण समिती, सोलापूर यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. बालकांच्या संरक्षणासाठी यापुढेही अशाच प्रकारे तत्पर आणि संवेदनशील कार्यवाही सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.