

वैराग : वैराग परिसरातील विविध शाळेत सोमवारी प्रवेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा झाला; मात्र यातील अनेक शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यास शुद्ध पाणी नाही की स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याचे दिसून आले. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली.
नविन शैक्षणिक वर्षाची सुरूवात म्हणून विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह गणवेशाचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी मुलांची वाजत गाजत मिरवणूक काढून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मात्र वैराग व परिसरातील बोटावर मोजता येतील एवढ्या शाळा सोडल्या तर अनेक जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी (फिल्टरचे) सोय उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना विहरिचे किंवा बोअरिंगचे अशुद्ध क्षारयुक्त पाणी किंवा शाळेतील साठवणूक केलेल्या टाकीचे पाणी पिण्यासाठी दिले जाते. यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
कित्येक शाळेत आरोग्य अधिकाऱ्यांचा पाणी तपासणी अवहाल उपलब्ध नाही किंवा पाणी तपासणीचे नमुने महिन्याला पाठवले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दिले जाणारे पाणी शुद्ध आहे का अशुद्ध हे लक्षात येत नाही. बालरोग तज्ञांच्या मते दररोज वयोमानुसार आवश्यक पाणी प्यावे लागते परंतू विद्यार्थी शाळेत जाताना ५०० मिली अथवा एक लिटरची पाणी बॉटल शाळेत सोबत घेऊन जातो. हे पाणी शाळेच्या वेळेपर्यंत अपुरे पडते. त्यामुळे त्याची तहान अर्धवट राहते.
लहान मुले ही खेळकर असतात खेळल्यानंतर त्यांना पाण्याची आवश्यकता असते परंतू सोबत दिलेले पाणी संपल्यानंतर तो पाणी घरी आल्यानंतरच पितो त्यामुळे शारिरीक दृष्ट्या कमजोर होऊन लहान मुले आजारी पडतात. या गंभीर प्रश्नाबरोबर शालेय स्वच्छता हा महत्वाचा भाग आहे मुलां - मुलींसाठी स्वच्छतागृह स्वच्छ नसतात तसेच अनेक शाळांमध्ये पोषण आहार बनवताना शुद्ध पाणी, स्वच्छ भांडी व स्वच्छ करून घेतलेले पोषण आहाराचे साहित्य ही दिसून येत नाही. त्यामुळे त्याच्या आरोग्याला हानी पोहचू शकते.