

लऊळ : माढा तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत कुर्मदास मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मंदिरात दररोज भाविक दर्शनासाठी येतात. वर्षातील सर्वात मोठी असणाऱ्या आषाढी एकादशीला येथे यात्रा भरते. जवळपास लाखाेंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. गाव प्रशासनाचा गलथान कारभार आणि सोईस्कर दुर्लक्षपणामुळे मंदिराच्या प्रमुख व विठुरायाच्या दर्शनासाठी चाललेल्या वारकऱ्यांच्या पालखी मार्गांवर कचऱ्याचे ढीग आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदरच्या ठिकाणी गावातील कचरा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीमधून टाकला जातो. याबरोबरच कारखान्यातील आम्लयुक्त मळीचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी तेथे ओतले जाते.
गावातील लोकांकडूनही याठिकाणी कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे परिसराला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. सबंध माळरानावर कचरा आणि प्लास्टिकचे कागद सर्वत्र पसरलेले दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांची चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे. तिकडे गावात सर्वत्र परिपूर्ण स्वच्छता होत असली तरी भाविक भक्तांच्या मार्गावर मात्र अस्वच्छता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची वेळेत दखल न घेतल्यास प्रवाशी आणि भाविकांना अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागणार असल्यामुळे प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.