

सोलापूर : शहरातून अनेक वर्षांपासून लुप्त झालेली आदिला नदी ही प्रत्यक्षात नदीच असून तिला नाला समजण्याची गंभीर चूक प्रशासनाने करू नये, असा जोरदार इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे. महापौर विनायक कोंड्याल यांनी आदिला नदी नसून नाला असल्याचे विधान करत लेआउट व बांधकाम परवान्यांबाबत भूमिका मांडली होती. मात्र या वक्तव्यावर पर्यावरण अभ्यासक आणि नागरिक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवत संताप व्यक्त केला आहे. आदिला नदीचे अस्तित्व नाकारल्यास महापुराचे संकट अटळ असल्याचा गर्भित इशारा देखिल पर्यावरण प्रेमींनी दिला आहे.
पर्यावरण प्रेमींच्या मते, शहरातील वाढते शहरीकरण, अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामांमुळे आदिला नदीचे मूळ स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. नदीचे पात्र अरुंद झाले असून अनेक ठिकाणी बांधकाम परवान्यांमुळे नैसर्गिक जलप्रवाह अडथळ्यात आला आहे. नदीला नाला समजून परवानग्या देण्याची प्रक्रिया चालू केल्यास भविष्यात मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
सोलापूर जिल्हामध्ये सप्टेंबर महिन्यांत निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा संदर्भ देत पर्यावरण प्रेमींनी सांगितले की, यंदा तसेच पुढील सलग दोन वर्षांत पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदिला नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता असून नदीपात्र अडथळ्यांनी भरलेले राहिल्यास महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः नदी परिसरातील अतिक्रमणे आणि अनियोजित वसाहती यामुळे परिस्थिती अधिक भीषण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.