

भंडारकवठे : मंद्रुप ते भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर ) दरम्यानच्या रस्त्यावरील इंदिरा नगर येथे जीवघेणा खड्डा पडला आहे. पावसाळ्याच्या पूर्वीपासून पडलेल्या या खड्ड्याच्या दुरुस्तीची तसदी बांधकाम विभागाने घेतली नाही. या खड्ड्यामुळे अपघात घडत आहेत. याची दुरुस्ती वेळीच होण्याची गरज आहे.
मंद्रुपच्या इंदिरा नगरमधील सांडपाणी येथील रस्त्यावर येते. याच पाण्यामुळे हा मोठा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्यामुळे येथून ये-जा करणार्यांना त्रास होत आहे. हा खड्डा चुकवताही येत नाही. चुकवण्याचा प्रयत्न केल्यास वाहन थेट रस्त्याच्या कडेला खड्ड्यातच जाते. बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. मोठ्या अपघाती घटनांची वाट हे प्रशासन पाहाते की काय? असा प्रश्न विचारला जात आहे. वेळीच याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भंडारकवठेसह विंचूर, निंबर्गी, सादेपूर, तेलगाव-भीमा यासह अन्य गावांतील नागरिकांनी दिला आहे.