

सोलापूर : सोलापुरात व्हीआयपी रोडवर दोन कोटींचे एमडी ड्रग्ज पकडण्यात आले होते. या ड्रग रॅकेटचा सूत्रधार कोण, त्याला कधी पकडणार, याबाबत आ. विजयकुमार देशमुख यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात आली असून, अमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाई सुरू असल्याची माहिती दिली.
राज्याच्या विधानसभा अधिवेशनाचा मंगळवारचा (दि. २३) दिवस राज्यातील अमली पदार्थाच्या तस्करीच्या विषयावर गाजला. ४० आमदारांनी अमली पदार्थ, ड्रग्ज यांच्या तस्करीबाबत प्रश्न विचारले. व्हीआयपी रोडवरील मुस्लिम कब्रस्तान परिसरात एका कारमधून सुमारे एक कोटी ९० लाख रुपये किमतीचे ९५० ग्रॅम ‘एम.डी. ड्रग्ज’ (मेफेड्रोन) शहर गुन्हे शाखेने मे महिन्यात पकडले होते. या प्रकरणात रिजवान शेख, साहिल पिरजादे, अर्शद मुर्शिद आणि कायनात पिरजादे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हे ड्रग्ज मुंबईहून सोलापुरात विक्रीसाठी आणले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. याबाबत आ. विजयकुमार देशमुख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत शासनाने कोणती कठोर कारवाई केली आहे, असा प्रश्न त्यांनी मांडला.