

नातेपुते : शहरातील भरधाव वेगाला नियंत्रित करण्यासाठी रस्त्यात ठिकठिकाणी गतिरोधक बांधण्यात आले आहेत. मात्र या गतिरोधकांवर मार्गदर्शक पट्टे नसल्याने गतिरोधक धोकादायक बनत चालल्याचे दिसून येत आहे. विशेषतः दिवसा व रात्री हे गतिरोधक दिसून येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे गतिरोधक न दिसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
तयार करण्यात आलेल्या गतिरोधकाची अधिक उंची असल्याने वाहने आदळत आहेत. वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुचाकीस्वार, मागील शिटावर बसलेल्या महिला गाडी आदळल्याने हमखास जोराने दहा फुटांवर जाऊन सरपटत पडत आहेत. याचवेळी शेजारी चाललेल्या चारचाकी अथवा मोठ्या चाकाखाली चिरडले गेले जाण्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण रहावे, यासाठी रस्त्यावर ठराविक अंतरावरील गतिरोधक कमी करावेत. कोणत्या रस्त्यावर किती गतिरोधक बसवणे बंधनकारक आहे. याबाबत काही नियम आखून देण्यात आले आहे, याचे काटेकोरपणे पालन करावे. या गतिरोधकांवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून रिफलेक्टर व गतिरोधकावर थर्मोप्लॅस्टिक पेंटने तयार केलेल्या पट्ट्या माराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.