

दीपक शेळके
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी सातत्याने आपल्या कामगिरीचा आलेख उंचावत जीव धोक्यात घालून आगीशी दोन हात करत शहरवासियांचे आगीपासून रक्षण केले आहे. आकस्मात लागलेल्या आगीपासून जीवित व वित्त हानी वाचविण्यासाठी हे दल जीवाची बाजी लावत असते. अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त घेतलेला आढावा...
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात पाच अग्निशमन केंद्रांमधून सेवा सुरू आहे. सध्या दलाकडे सर्व मिळून 9 गाड्या असून अरुंद रस्ते व लहान गल्लीबोळांमधील आग आटोक्यात आणण्यासाठी एक मिनी फायर फायटर वाहन, दोन फोम टेंडर फायर गाड्या शहराच्या सेवेसाठी सज्ज आहेत. आग, अपघात तसेच अन्य आणीबाणीप्रसंगी अग्निशमन दलाचे जवान विलंब न करता घटनास्थळी धाव घेतात.
गेल्या वर्षभरात दलाने 387 आगींवर यशस्वी नियंत्रण मिळवले, तर 172 ठिकाणी बचाव व मदतकार्य केले आहे. या धाडसी मोहिमांमुळे तब्बल 10 लाख 42 हजार रुपयांचे नुकसान रोखण्यात यश आले आहे. मात्र, आग आणि अपघातांच्या घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. शहरात झपाट्याने वाढणाऱ्या उंच निवासी आणि व्यावसायिक इमारतींमुळे अग्निशमन यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेषतः उंच इमारतींमध्ये आग लागल्यास बचावकार्य करण्यासाठी मोठ्या शिडीच्या गाड्यांची तीव्र कमतरता भासत आहे. त्यामुळे अनेकदा जवानांना जीव धोक्यात घालून बचावकार्य करावे लागत आहे. शहराची वाढती लोकसंख्या, विस्तारत चाललेली हद्द आणि वाढणाऱ्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त अग्निशमन केंद्रे, आधुनिक शिडीगाड्या आणि मनुष्यबळ वाढविण्याची गरज तीव्रतेने पुढे आली आहे.