

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवत 87 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.
महापालिकेच्या 102 जागांपैकी भाजपाकडे आलेले हे बहुमत केवळ सत्ता नाही, तर शहराच्या राजकारणावर पूर्ण वर्चस्व सिद्ध करणारे ठरले आहे. दुसरीकडे विरोधकांची अवस्था मात्र नाममात्र झाली असून शिवसेना (4), एमआयएम (8), काँग्रेस (2) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (1) अशी एकूण विरोधी संख्या 15 वरच अडकली आहे.
निकालानंतर शहरात विजयी नगरसेवकांचे सत्कार, हारतुरे, पेढे आणि फटाके यांची लगबग सुरू आहे. मात्र या झगमगाटाच्या आड खऱ्या सत्तेची गणिते वेगाने मांडली जात आहेत. भाजपच्या वर्तुळात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विषय समित्या आणि स्वीकृत नगरसेवकपद यासाठी आतल्या आत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या सत्तासमीकरणात तीन आमदार निर्णायक भूमिका बजावणार असल्याची चर्चा आहे. कोणाच्या शब्दाला वजन मिळणार, कोणता गट वरचढ ठरणार, यावरच महापौरपदाचा शिक्का बसणार आहे. विशेष म्हणजे बहुमत प्रचंड असले तरी सामाजिक समतोल, प्रभागनिहाय प्रतिनिधित्व आणि संघटनात्मक निष्ठा यांचा बारकाईने विचार केला जात असल्याचे सूत्रांकडून समजते.
स्थायी समितीवर कोणाचा प्रभाव राहणार, महत्त्वाच्या विषय समित्या कोणाच्या ताब्यात जाणार, विषय समितीचे सभापती कोण होणार? तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून कुणाला संधी मिळणार, यासाठी अनेक इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाचे वरिष्ठ नेते सत्तेचा वापर भविष्यातील राजकीय मजबुतीसाठी कसा करायचा, याचे दीर्घकालीन नियोजन करत आहेत. सत्तेचा किल्ला भाजपाच्या हाती असला तरी, खुर्च्यांसाठीची लढाई मात्र आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. सोलापूरचा पुढचा महापौर कोण, याकडे अवघ्या शहराचे लक्ष लागून राहिले आहे.