

सोलापूर : परिवहन महामंडळाच्या लालपरीत गेल्या एक मेपासून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणत स्वागत केले जात आहे. आपली बस, आपली सेवा या महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाद्वारे केली जात आहे.
लालपरी बसस्थानकातून सुटण्यापूर्वी राज्याच्या नावाने जयजयकार करून होत आहे. एसटी सुटण्यापूर्वी संबंधित वाहक व चालक हे प्रवाशांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणत आपली स्वतःची ओळख करून देतात. या पद्धतीच्या स्वागताने प्रवाशांनाही समाधान वाटत आहे. महामंडळाच्या ताफ्यात नव-नवीन अनेक बसेस दाखल होत आहेत. एसटीच्या अनेक मार्गांवरील फेऱ्यांमध्ये वाढ होत आहे. तरीही प्रवाशांचा अपेक्षित इतका कल महामंडळाच्या लालपरीकडे वाढत नसल्याने व यावर उपाय योजण्यात आले आहेत.
प्रवाशांना उत्तम सेवा, वेळेत तक्रारींचे निवारण करून ते कमी करणे आदी महत्त्वाच्या बाबींवर महामंडळाने उपाय शोधले आहेत. आपली बस, आपली सेवा या अभियानावर भर दिला जात आहे. तसेच लालपरीतील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी अन्य उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसह अन्य सुविधाही देत आहे. यात स्वच्छतेवर भर राहील. सेवा सुधारण्यासाठी अभियान राबवले जात आहे. महामंडळाच्या लालपरीतील प्रवासी संख्या वाढविणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानातील मुख्य घटक हे चालक-वाहकच आहेत. लालपरीने प्रवास करत असलेल्या प्रवाशांचे स्वागत केले जात असल्याने त्याचे प्रवाशांनाही समाधान वाटत आहे.