

सोलापूर : विधानपरिषद निवडणूक निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी दोघांचेही मतांचे दावे काही प्रमाणात फोल ठरल्याचे चित्र दिसून आले. भाजपचा ५०० पारचा आकडा चुकला तर राष्ट्रवादीचे संपूर्ण गणितच बिघडले. परंतु त्यांना स्थानिक आघाड्या तसेच इतर पक्षातील मते मिळाल्याचे दिसते.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रथम विरोधकांकडे १६ मतेही नसल्याचे सांगितले होते. परंतु जसजसा प्रचार सुरु झाला तशी निवडणुकीत रंगत यायला सुरुवात झाली. महायुतीकडे भाजपचे ३०४, शिवसेना शिंदे गटाचे ७६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४८ असे एकूण ४२८ मतदार होते. तर महाविकास आघाडीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ३२, शिवसेना उबाठाचे ३१ आणि काँग्रेसचे १८ असे ८२ मतदान होते. यातील माढ्यातील काँग्रेसच्या १३ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तो आकडा ६९ झाला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व शक्ती पणाला लावून शरद पवार गटाचे तीनही आमदार गळाला लावले.
शेकापचे आ. बाबासाहेब देशमुख यांना सोबत घेतले. त्यानंतर स्थानिक कुर्डूवाडी येथील उबाठाचे नगरसेवक, पंढरपुरातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक, वैराग येथील स्थानिक विकास आघाडीचे नगरसेवक यांचा पाठिंबा मिळवला. यामुळे भाजपकडे आठ विद्यमान आमदार, नऊ माजी आमदारांचे बळ होते. त्यामुळे त्यांना ५०० पेक्षा अधिक मते मिळतील, असा विश्वास होता. मात्र त्यांची गाडी ४८३ मतदारांवर अडकली. दुसरकडे राष्ट्रवादीचे खा. धैर्यशील माेहिते- पाटील यांनी अदृश्य शक्ती आमच्या मागे असल्याचे सांगत विजयाचा दावा केला होता. परंतु तो केवळ नावापुरता असल्याचे समोर आले. त्यांना २०० मते मिळतील, असा अंदाज होता, परंतु तो देखील सपशेल फेल गेला.