

सोलापूर ः श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटबाहेर कचरा जाळण्याचा प्रकार घडत असल्याने परिसरात धूर मोठ्या प्रमाणात होतो. या प्रकारामुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांचा जीव गुदमरल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बाजार समितीच्या पाठीमागील भिंतीलगत मोठ्या प्रमाणात संपूर्ण मार्केटमधील प्लास्टिक व कागदी कचरा टाकला जात असून, या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी तो सर्रास पेटवून दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून कचरा गोळा करून त्याला आग लावण्यात आल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे. या धुरामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक जाळणे हे कायद्याने गुन्हा असतानाही मार्केट कमिटीकडून उघडपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून होत आहे.