

सोलापूर : फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा आंबा यंदा तब्बल एक महिना उशिराने दाखल झाला आहे. रत्नागिरी हापूस, देवगड, मालवण आणि कर्नाटकातील आंबे बाजारात दाखल झाले आहेत. एक महिना उशिरा आंबा दाखल झाला असला तरी त्याचे बाजारातील साठा मुबलक नाही. मोजक्याच कॅरेटमध्ये त्याचा साठा उपलब्ध आहे. आवडीने खाणाऱ्या खवय्यांना आंबा पहिल्या टप्प्यात तरी महागच मिळत आहे.
गत वर्षीचा पावसाळा जवळपास दोन महिने लांबला होता. त्याचा परिणाम यंदाच्या आंबा उत्पादनावर झाला आहे. आंबा पिकाच्या फुलापासून ते फळ धारणेपर्यंतचा कालावधी यावर्षी वाढल्याने याचा परिणाम हा आंब्याच्या बाजारातील आगमनावर सुद्धा झाला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आंबा येत असे. तो यंदा तो मार्च महिन्याच्या मध्यंतरानंतर आला आहे. आलेला साठाही अत्यल्प आहे. आजच्या घडीला बाजारात केशर आंब्याचे अडीचशे किलोचे पंधरा ते वीस कॅरेटच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. देवगडचा हापूस आंबा डझन, सव्वा डझन आणि दीड डझनचे दोनशे बॉक्स उपलब्ध आहेत. त्याची विक्री हजार ते दीड हजार रुपये बॉक्स या दराने विक्री सुरू आहे. तर लालबागचा आंबा हा मुंबईवरून बाजारात येतो. त्याची 80 रुपये ते 120 रुपये किलो दराने विक्री सुरू असून याचे 20 किलोचे 40 ते 50 कॅरेटच बाजारात आहेत.