

करमाळा : तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने १३ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून ८ टँकरद्वारे पाणीटंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पावसाने दडी मारल्याने दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ लागली आहे. विहिरी, बोअरवेल व इतर जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
पावसाळ्याचा कालावधी पुढे सरकत असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील पाणीप्रश्न अधिक तीव्र झाला आहे. घोटी, शेलगाव (क), सरफडोह, निंभोरे, अंजनडोह, देलवडी गावांमध्ये विहिरींचे पाणी आटले असून, उपलब्ध पाणीसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. महिलांसह नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र वाड्या-वस्त्यातून दिसून येत आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका महिला, शेतकरी, पशुपालक आणि जनावरांना बसत असून प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.
टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर
पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रशासनाने फिसरे, तरटगाव, कोंढेज, घोटी, शेलगाव (क), सरपडोह, निंभोरे या टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. वरकटणे, घारगाव व कोंढेज येथे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे, अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली.