

करमाळा : अडीच लाख रुपयांचे दागिने घरातील कपाटातून चोरीला गेलेे असून याबाबत मंगल यशवंत खरात (रा. केत्तुर 2) यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. ही घटना 15 मे ते 25 मे दरम्यान घडली असून 25 मे रोजी चोरी उघडकीस आली आहे. अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मंगल खरात यांनी पत्रकारांना दिली आहे.
मंगल खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे केत्तुर येथील राहत्या घरातून दोन सोन्याचे डोरले, 4 सोन्याचे मोठे मणी, 147 लहान सोन्याचे मणी, बाळाचे लहान बदाम, सटवाई 1 मथ, चांदीचे बाळाचे पैंजण, चांदीच्या 2 बांगड्या, चांदीचे कंमरेची साखळी आदी वस्तू असा अंदाजे रक्कम दोन ते अडीच लाख रुपये किमतीचे दागदागिने कपाटामध्ये ठेवलेे होते. अर्जदार मंगल खरात या शिवणकाम करण्याचा व्यवसाय करून त्यातून त्या उदरनिर्वाह करीत आहेत.
त्यामुळे मंगल खरात यांच्याकडे कपडे शिवायला तसेच ओळखीच्या व्यक्तीही त्यांच्याकडे गप्पा मारायला येत असतात. त्यामुळे त्यांनी कपडे शिवायला आलेल्या व्यक्ती किंवा अज्ञात व्यक्तींनी कपाटातून दरम्यानच्या काळात कधीतरी दागिने चोरून नेले आहेत, अशा आशयाची लेखी तक्रार मंगल खरात यांनी पोलिसांत दिली आहे. त्या दागिन्याच्या चोरीचा तपास करमाळा पोलिसांनी तत्काळ करावा, अशी मागणी मंगल खरात यांनी केली आहे.