

उडगी : अक्कलकोट तालुक्यातील मौजे संगोगी (आ) गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. या कामात मोठा भोेंगळ कारभार झाल्याचा आरोप नागिरकांसह सामाजिक कार्यकर्ते शरणप्पा चलगेरी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे. या कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी चलगेरीसह ग्रामस्थांमधून केली जात आहे.
येथील जलजीवन कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्लट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. चलगेरी यांच्यानुसार, टाकीपासून गावापर्यंत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनसाठी केवळ दीड फूट खोल खड्डे खोदण्यात आले असून, शासन नियमानुसार हे खड्डे किमान तीन फूट खोल असणे आवश्यक होते. तसेच टाकीपासून विहिरीपर्यंतच्या लाईनमध्येही निष्काळजीपणा करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, या कामाबाबत मी 10 महिन्यांपूर्वी लेखी तक्रार दिली होती, मात्र अजूनही कोणतीही चौकशी झालेली नाही. टाकीचे बांधकाम करतानासुद्धा काही दिवस पाणी मारण्यात आले नाही. त्याचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
याबाबत संबंधित अधिकार्यांनी दुर्लक्ष केले. हे सगळं काम फक्त निधी उचलण्यासाठी होत असल्याचा आरोप चलगेरी यांनी यामागे असलेल्या ठेकेदार, ग्रामपंचायत आणि काही अधिकार्यांच्या मिलीभगतीचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे तत्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, ते थेट मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.