

माळशिरस : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत यावर्षी चार कामांना मंजुरी होती. संस्थांना कामे दिली होती. परंतु कामे न झाल्याने गाळ काढला गेला नाही. त्यामुळे पाऊस तलाव भरले असले तरी गाळामुळे तळ्यांची साठवण क्षमता कमी झाली. त्याचा नाहक फटका शेतकर्यांना बसणार आहे.
माळशिरस तालुक्यात अनेक पाझर तलाव व गाव तलाव आहेत. परंतु या तलावामध्ये गाळाचे प्रमाण अधिक झाल्याने या तलावांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. पाऊस होऊन तलाव भरूनदेखील पाणी साठवण क्षमते एवढे पाणी साठले जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच पाण्याची कमतरता भासत आहे. यासाठी या तलावातील गाळ काढून या तलावांची पाणी साठवण क्षमता वाढावी. या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु, गेली दोन वर्षे संस्थांना कामे देऊनही कामे झाली नाहीत.
यावर्षी जळभावी, कारुंडे, पिरळे, कोथळे या गावातील तलावामधील गाळ काढण्याच्या कामांना मंजुरी मिळाली होती. या प्रत्येक कामासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे यावर्षीही ही योजना राबवली गेली नाही. त्यामुळे गाळ काढला गेला नाही. ऑगस्ट महिन्यातच तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊन तलाव भरले. परंतु, साठवण क्षमता वाढली नाही. याचा फटका या तलावाखालील शेतकर्यांना बसणार आहे. संस्था कामे घेऊन करीत नाहीत. अशा संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.