

सोलापूर ः 10 फेबु्रवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील 54 हजार 875 विद्यार्थी 119 केंद्रावर परीक्षा देणार असून, माध्यमिक शिक्षण विभागाकडून पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार असून, यासाठी जिल्हा स्तरावरील सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून प्रत्येक तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नजर राहणार असून, संवेदनशील केंद्रावर मोठ्या प्रमाणात वॉच ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी, बारावी परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. त्यांच्या सूचनेनुसार दहावी, बारावी परीक्षेसाठी जिल्हास्तरीय सात भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षण विभागातील महिलांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून विभाग स्तरावर तीन भरारी पथके कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व केंद्र संचालकांनी आपल्या केंद्रात कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात 437 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे विभागातून बारावीच्या परीक्षेसाठी सर्वाधिक 2 लाख 60 हजार 266 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, इतर विभागांतील नोंदणीची आकडेवारीही लक्षणीय असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. 64 हजार 454 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात 188 परीक्षा केंद्राची माध्यमिक शिक्षण विभागाकडून सोय करण्यात आली आहे.