

सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी पंढरपूर शहरात २०५ तर ग्रामीण भागात १३५ अशा ३४० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पाच ठिकाणी तात्पुरते अतिदक्षता विभागही तयार केले आहेत.
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर शहरात महत्त्वाच्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. त्यावर उपाय म्हणून १२९ आरोग्य दूत दुचाकीवरून औषधांच्या किटसह फिरणार आहेत. दहा दिंड्यांमागे १ आरोग्य दूत नेमण्यात आला आहे. पालखी मार्गावर पाच ठिकाणी तात्पुरते आयसीयू युनिट उभारले असून या विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. हॉटेल्स, टपऱ्या व पाणपोईचीही तपासणी सुरू आहे. महिलांसाठी ठिकठिकाणी हिरकणी कक्ष व समुपदेशन केंद्रही उभारण्यात आले आहेत. शहरात औषधकेंद्रातून सर्व प्रकारच्या औषधांची व्यवस्था केली आहे.
वैद्यकिय यंत्रणा अलर्ट मोडवर
ग्रामीण भागात २५ व शहरात १७ औषधोपचार केंद्रे २४ तास कार्यरत राहतील. पाणी दूषित होऊ नये म्हणून पालखी मार्गावरील ५३७ पाणी स्त्रोतांचे नमुने तपासून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. १५ ठिकाणी टँकरने शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहरात दर्शन मंडप ते सारडा भवन, गोपाळपूर, पत्राशेड आणि विणेगल्ली व स्वेरी कॉलेज परिसरात तालुका स्तरावरील वाढीव ५० आरोग्यदूतांचे पथक नेमण्यात आले आहे.
महिला वारकऱ्यांसाठी स्तनपान व विश्रांतीसाठी हिरकणी कक्ष
ठिकठिकाणी समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, मदतनीस तैनात
२८ कायम आणि ३४० तात्पुरती हॉटेल्सचीही तपासणी सुरू
कीटकनाशक सर्वेक्षण असून, ती २२ गावांमध्ये कंटेनर सर्व्हे पूर्ण केले.
उजनी धरणातून वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी १६०० क्युसेक्स पाण्याचे विसर्गाचे नियोजन.