

सोलापूर : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या विहिरीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिले आहे. शुक्रवारी (दि.3) शिवरत्न सभागृहात जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष वैद्य यांनी आदेश दिले आहेत. यावेळी अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर, सभापती रामप्पा चिवडशेट्टी, झेडपी सदस्य सिद्धराम शिवमूर्ती, गीतांजली साळुंखे, नंदकुमार काळे, शनमुखी कोरके आदी उपस्थित होते.
अध्यक्ष म्हणाले, एल निनोमुळे पाऊस कमी पडणार आहे. त्यामुळे पाणीटंचाई भासणार आहे. पाणीटंचाई भासू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करणारे विहिर ५० फुटापेक्षा जास्त खोली करण्यात येणार आहे. तसेच जेथे गरज असेल तेथील विहिरीतील गाळ काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मे २०२६ अखेर सोलापूर जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळीत ०.१८ मीटरने वाढ झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. महावितरण विभागाने मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांसह सर्व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना अखंडित वीजपुरवठा देण्याची दक्षता घ्यावी, विशेषतः नदीकाठावरील योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.