

सोलापूर : आखाती देशातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात इंधन पंपावर काळाबाजार होऊ नये, तसेच पंपातून ग्राहकांना इंधन देताना त्या मापात पाप होऊ नये, यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त भरारी पथक तपासणी करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल पंपावर इंधन भरताना प्रति लिटरमागे काटामारी करुन कमी इंधन दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या अनधिकृत साठवणुकीसह काळाबाजार होत आहे. ती रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तालुकानिहाय संयुक्त भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.
शहर व जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपांवर डिझेल खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याने काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना पेट्रोलियम उत्पादनांची साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नियुक्त पथक तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली छापेमारी करून काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करेल व त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सध्या खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी इंधनाचा तुटवडा जाणवू नये, यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. संबंधित पंपावरून डिझेल ड्रममध्ये नेताना संबंधित शेतकऱ्यांची सात बारा कुठल्या गावांत, त्याची नावे, पत्ता, संपर्क क्रमांक याची माहिती पंपावरील रजिस्टरमध्ये ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे काळाबाजार रोखणे शक्य होणार असल्याचेही एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.