

सोलापूर : सोलापूरच्या चारही बाजूने राष्ट्रीय महामार्ग आहे. अनेक ठिकाणी ढाबे, हॉटेल, व्यावसायिक दुकाने यांचे महामार्गालगत अतिक्रमण आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या दोन महिन्यात ही अतिक्रमणे काढली जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आता सेफ होणार आहेत.
न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग सुरक्षिततेसाठी विविध निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यबिंदूपासून ४० मीटरपर्यंत निवासी, ७५ मीटरपर्यंत व्यावसायिक वापरासाठी जमीन वापरावर निर्बंध लादले आहेत. ढाबे, बिअर बार यामुळे वाहतुक कोंडी होत असल्याचे दिसून येते. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती दल तर तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समिती स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत.