

दक्षिण सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे कठोर निकष व अटी न लावता जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळी परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले असतानाही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून काही भागात पिकांची उगवणही झालेली नाही. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, दुष्काळ जाहीर करण्यासाठी कठोर निकष व अटी लावू नयेत, वाडी-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्यापूर्वी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात. ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.