

सांगोला : रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर अनकढाळ टोलनाक्यावर वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी कर्नाटक व कोकण या भागातून आषाडी वारीसाठी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने आढवून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत आहेत. यामुळे वारकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे काळाची गरज आहे.
श्री विठ्ठलाच्या आषाडी वारीसाठी कर्नाटक, कोकण, कोल्हापूर, सांगली, गोवा आदी भागातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत येतात. त्यांचे वाहन व जेवणाचे साहित्य वाहण्यासाठी अनेक वाहने असतात. त्याचबरोबर अनेक वारकरी चार चाकी वाहने घेऊन वारीसाठी येत आहेत. या वारकऱ्यांची वाहने अडवून महामार्ग पोलीस आर्थिक पिळवणूक करत आहेत. यामुळे वारकऱ्यांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.
कोल्हापूर नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर अनकढाळ टोळ नाक्यावर वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन वाहनधारकातून होते की नाही ? हे पाहून वाहतुक नियमांच्या आधारे वाहन धारकांना दंड आकारला जात आहे. वाहतुकीबाबत जनजागृती करण्याऐवजी रस्ते वाहतुकीच्या जनजागृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हेच अधिकारी कमी पडतात, मात्र नियमांकडे बोट दाखवत वाहनधारकांकडून "चिरीमिरी" घेत असल्याचे चित्र अनकढाळ टोल नाक्यावर दिसून येत आहे.
अपघात बचावाच्या उदिष्टाला हरताळ फासण्याचे कामच महामार्ग पोलिस अधिकारी व कर्मचारी करीत असल्याचे चित्र टोल नाक्यावर दिसून येत आहे.दररोज सांगोला तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर, अनेक अपघात घडत आहेत. त्यावेळी हेच वसुली करणारे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी कुठे असतात? असाही सवाल या निमित्ताने सर्व सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.
महामार्ग शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांकडून नियमाचे उल्लंघन न झाल्यास जरूर कारवाई आणि दंड करावा, परंतु कारवाई आणि दंड करताना त्यांनी वाहतुकीचे नियम काळजीपूर्वक जनसामान्य नागरिकांच्या, वाहनधारकांच्या मनी उतरवण्यासाठी सुद्धा तेवढेच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे वाहनधारकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.