

राहुल सोनवणे
कामती : सोन्याच्या लालसेपोटी मृतदेहाची राख व अस्थी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना कुरुल येथे घडली आहे. स्मशानभूमीतून झालेल्या या चोरीमुळे गावभरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी तातडीने स्मशानभूमीत सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे.
बुधवारी (दि.१७) उज्ज्वला संतोष माळी (रा. कुरुल) यांचे निधन झाले. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी त्यांचा अंत्यविधी सोहळा स्मशानभूमीत केला. परंतु गुरुवारी (दि.१८) सकाळी अस्थी व राख सावडण्यासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेले असता राख व अस्थी गायब झाल्याचे आढळले. या घटनेमुळे माळी कुटुंबासह गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
परंपरेनुसार, जर मृत्यू झालेली महिला सौभाग्यवती असेल, तर तिच्या अंगावरील दागिने अंत्यसंस्कारावेळी तसेच ठेवले जातात. हीच बाब लक्षात घेऊन काही टोळ्या माहिती गोळा करतात आणि संधी साधून मध्यरात्री स्मशानभूमीत घुसून राख व अस्थी चोरी करतात.
मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या या कृत्यांवर आळा बसवण्यासाठी स्मशानभूमीत प्रखर दिवे, स्ट्रीटलाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.