

मोहोळ : सीना नदीपात्रामध्ये चांदणी, खासापुरी, सीना कोळेगाव तर भोगावती नदीपात्रात हिंगणी, ढगे पिंपळगाव, जवळगाव मध्यम प्रकल्पातील अतिरिक्त पाणी सोडल्याने आलेल्या महापुरामध्ये मोहोळ तालुक्यातील शेती पिकांचे तर नद्यांचे पाणी गावात आणि वस्त्यांमध्ये शिरल्याने अतोनात नुकसान झाले होते. शेती पिकांच्या नुकसानीसह इतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी रात्रीच्या अंधारात केंद्रीय पथकाने बॅटऱ्यांच्या उजेडात पाहणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
मोहोळ तालुक्यातील आष्टे, शिंगोली, तरटगाव, पिरटाकळी, शिरापूर(मो.), नांदगाव, कामती खुर्द, पासलेवाडी,बोपले, भोयरे, नरखेड, वाळूज, देगाव, एकुरके, मलिकपेठ, घाटणे, कोळेगाव, रामहिंगणी, आष्टे, शिरापूर (सो.), लांबोटी, पोफळी अशा 22 गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह घरांचे आणि संसारोपयोगी साहित्य तसेच औजारांचे पुराच्या पाण्यामुळे अतोनात नुकसान झाले होते. त्याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी दि.4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी केंद्र सरकारचे पथक रात्री सातच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील आष्टे, कोळेगाव व देशमुख वस्ती येथे पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेला निधी हा पुरेसा नाही, अतोनात नुकसान झाले आहे.
आमचा प्रपंच उद्ध्वस्त झाला आहे. शेती पुन्हा उभा करण्यासाठी भक्कम निधीची गरज आहे. महाराष्ट्र शासनाची मदत तुटपुंजी आहे. यामध्ये आम्ही शेती पिकांचे खतपाणी आणि मेहनतदेखील करू शकणार नाही. अशा व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत केंद्रीय पथकाने दिलासा देत ‘केंद्राकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही धीर धरा, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.