

सोलापूर : महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीवेळी सत्ताधारी भाजपने एमआयएमसोबत हातमिळवणी करत सर्वच समित्यांवर वर्चस्व मिळवले.
सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सात विषय समित्यांवरील तब्बल 62 सदस्यांची बिनविरोध निवड एकमताने मंजूर करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत काँग्रेस आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला एकही स्थान न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
भाजपने आपल्या संख्याबळासोबत एमआयएमच्या सदस्यांना प्रत्येक समितीत स्थान देत समीकरणे जुळवली. काही नगरसेवकांना दोन समित्यांवर संधी देण्यात आल्याने पक्षांतर्गत संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसून आला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे एकमेव नगरसेवक वैभव हस्तुरे यांना स्थापत्य समितीत स्थान देत भाजपने स्थान देऊन दिलेल्या पाठिंब्याचे फळ दिले आहे. विषय समित्यांमध्ये भाजपचे वर्चस्व दिसून आले.