

सोलापूर : दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला सोलापूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी बहुतांश दुकाने सुरू होती. मात्र, दुपारी सुमारे १२ ते १ यावेळेत शहरातील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यानंतर दुपारनंतर बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकाने पुन्हा सुरू केल्याने जनजीवन सुरळीत झाले.
बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. शहराध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहर महासचिव विनोद इंगळे तसेच वंचितचे नेते रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बंदला पाठिंबा दर्शविला.
मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झाली. त्यानंतर चाटी गल्ली, सराफ कट्टा, हलवाई गल्ली, टिळक चौक आणि नवी पेठ मार्गे मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पोहोचला. तेथे मोर्चाची सांगता करण्यात आली. बंद आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून बंद शांततेत पार पडला.
जोरदार घोषणाबाजी
मोर्चात सहभागी नेते तसेच कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. बंदच्या हाकेमुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.