

वाशिंबे : अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेतील जलमार्ग विस्कळीत झाल्याने भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील केळी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट फटका सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर (पाणलोट) क्षेत्रातील कंदर, वाशिंबे येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांसह हार्वेस्टिंगसाठी येणाऱ्या मजुरांना बसला आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम केळी उत्पादन होते, पण युद्धामुळे निर्यात बंद पडल्याने हार्वेस्टिंग कामे थांबली असून, मजूर गावी परतले आहेत.
उजनी धरणाच्या काठावरील टेंभुर्णी,करमाळा परिसरातील केळी बागा केळी हब म्हणून ओळखल्या जातात. येथे हजारो मजूर हंगामी कामासाठी येतात, ज्यात हार्वेस्टिंग, पॅकिंग आणि लोडिंगचे काम असते. सामान्यतः रमजानच्या काळात आखाती देशांना (इराण, इराक, दुबई ,सौदी ) मोठ्या प्रमाणात केळी निर्यात होते, पण अमेरिका-इराण संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद पडल्याने जहाजे माघारी फिरत आहेत. अनेक कंटेनर सोलापूरमधून परत आले किंवा अडकले आहेत. यामुळे केळी हार्वेस्टिंग पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे हार्वेस्टिंगसाठी आलेले मजूर आता काम नसल्याने परत गेलेत. मालाल उठाव नसल्याने केळीच्या बागा काढणीच्या पुढे जात आहेत. निर्यात नसल्याने कापणीच होत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा होत आहे.
निर्यात बंद पडल्याने स्थानिक बाजारात केळीची अतिरिक्त आवक झाली असून, भाव कोसळले आहेत. निर्यातीचे दर 18 -24 रुपये प्रति किलो असताना आता 9-10 रुपयांवर आले आहे. उजनी परिसरातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.