

दीपक शिराळकर
सोलापूर : सोलापूर शहरातील सर्व एलपीजी पंप गॅसअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. गॅसअभावी सुमारे आठ हजार रिक्षांची चाके थांबली असून, चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री, पालक मंत्री आणि जिल्हाधिकारी गॅसचा तुटवडा नाही असे वारंवार सांगत असले, तरी मात्र प्रत्यक्षात शहरातील सर्व एलपीजी पंप गॅसअभावी बंद आहेत. गॅससाठी रिक्षा चालक दिवसभर पंपावर रांगा लावून उभे असतात. तरीही सायंकाळी त्यांना विना गॅस रिक्षा ढकलत घराकडे न्यावी लागत आहे. कारण, पंपावर गॅस शिल्लक नसल्याचे तसेच तो कधी उपलब्ध होईल याची खात्री नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे रिक्षा चालकांची दैनंदिन कमाई बंद झाली असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने रिक्षाचालकांमध्ये मोठा संताप आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत रिक्षांना गॅस पुरवठा पूर्ववत न झाल्यास जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटनांनी, चालकांनी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, अशी भूमिका रिक्षा संघटनांनी, चालकांनी घेतली आहे.