

सोलापूर : शहरातील आसरा रेल्वे पुलाच्या कामासाठी अतिक्रमणामुळे अडथळे येत होते. गेल्या दोन वर्षांपासून यासंदर्भात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडून महापालिकेला पत्र व्यवहार केला होता. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने कारवाई करून तीन पक्क्या इमारती, तीन पत्र्यांची घरे आणि वॉल कंपाऊंड जेसीबीच्या साहायाने जमीनदोस्त केले.
सोलापूर शहरातील आसरा पूल (ब्रीज क्र. 458/5) प्रकल्पाला अतिक्रमणामुळे अडथळे निर्माण होत आहे. संबंधित विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नव्हती. या संदर्भात रेल्वे प्रशासन (एमआरआयडीसी) व संबंधित यंत्रणांकडून 22 जुलै 2022 पासून ते 29 जानेवारी 2024 पर्यंत विविध पत्रांद्वारे अतिक्रमण हटविण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. या प्रकरणावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती. या अतिक्रमणामुळे प्रस्तावित पुलाच्या बांधकामाच्या कामात अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया करावी, अशी मागणी महाराष्ट्र रेल इन्फ्रान्स्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आली होती.
महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलिस बंदोबस्तात बेधडक कारवाई करण्यात आली. अडथळा ठरणाऱ्या तीन पक्क्या इमारती, पत्र्यांची तीन घरे तसेच वॉल कंपाऊंड जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात होता.