

सोलापूर : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विमानतळ कार्यान्वित असून राज्यातील विमानसेवेचा विस्तार करण्यासाठी आवश्यक सुविधांचा विकास करण्यात येत आहे. येत्या काळात हैदराबाद आणि तिरुपतीसारख्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुरलीधर मोहोळ यांनी दिली. देशातील पहिले समुद्रातील विमानतळ पालघर येथे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती होटगी रोडवरील विमानतळावर आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
सोलापूर-मुंबई विमानसेवेची नागरिकांची मागणी पूर्ण होत आहे, ही सोलापूरकरांना दिवाळीची दिलेली भेट आहे. सोलापूर हा राज्यातील दक्षिण-पश्चिमेकडील महत्त्वाचा जिल्हा आहे. देवभूमी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. वस्त्रोद्योगासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर देशाच्या आर्थिक राजधानीला जोडले जात असल्याने उद्योग-शेती विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही मोहोळ म्हणाले.
‘उडान’ योजनेंतर्गत 65 कोटी रुपये खर्च करून विमानतळ टर्मिनल इमारत उभारण्यात आली आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेसाठी आर्थिक तूट भरून काढण्यासाठी राज्य शासनाने हमी घेतल्याने ही विमानसेवा सुरू होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.