

सोलापूर : राज्य शासनाच्यावतीने रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्यास हेक्टरी 10 हजार रुपयेप्रमाणे शुक्रवारी दि. 7 नोव्हेंबरपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात महापूर व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामे झालेल्या क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये रब्बी पेरणी बियाणे व इतर अनुषंगिक खर्चासाठी देण्याचे जाहीर केले होते. त्यानूसार 4 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील सात लाख 82 हजार शेतकऱ्यांच्या सहा लाख 52 हजार 65 हेक्टरसाठी 652 कोटी रुपये मंजुरीचा आदेश निघाला.
त्यामुळे पेरणीसाठीचा रक्कम कधीपासून जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. त्यानंतर जून- सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपयांप्रमाणे जिल्ह्यातील 652 कोटी सहा लाख 55 हजार रुपये मंजूर झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे करुन ती रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावेत या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून प्रशासनाची लगबग सुरु झाले आहेत.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांत ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून, येत्या आठवडाभरात सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे जमा होणार आहेत. प्रति तीन हेक्टरपर्यंत पेरणीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.