

सोलापूर : नागरिकांनी नोंदवलेल्या अधिसूचित सेवा वेळेत न निकाली काढणाऱ्या आणि तक्रारी प्रलंबित ठेवणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अखेर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसात 49 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंड आकारला असून 20 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिले आहेत.
महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, बांधकाम परवाना, विविध झोन कार्यालय, आरोग्य विभाग, नगर रचना विभाग, कर आकारणी, भूमिलेखापाल, भूमी मालमत्ता, उद्यान तसेच इतर संबंधित विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विविध सेवा विहित कालावधीत न दिल्याचे निदर्शनास आले होते.
या प्रकरणात नागरिकांच्या तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई अटळ असल्याचा कडक इशारा महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला आहे.