

नातेपुते : हरहर महादेव अशा जयघोषात विविध वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत मानवी साखळी द्वारा शिखर शिंगणापूरच्या अवघड मुंगी घाटातून कावडी चढवण्याच्या पारंपारिक सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला. भक्ती व शक्तीचा अगाध महिमा पाहण्यासाठी लाखो शिव भक्तांनी डोंगर माथ्यावर एकच गर्दी केली .
सासवड जिल्हा पुणे येथील शिवभक्त तेली भुतोजी महाराज यांची मानाची कावड चैत्र शुद्ध रामनवमीला पवित्र संगमावरील नदीचे जल घेऊन शिखर शिंगणापूर प्रस्थान करत असते. सोमवारी दुपारी दु.3 च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर, उपसभापती मनिषा पाटील, तहसीलदार सुरेश सेजुळ,नायब तहसीलदार अमोल कदम, गट विकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जि.प.सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, सपोनि विशाल वायकर , कोथळे गावचे सरपंच रेखा माने यांनी ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकारी यांनी कावडयाचे स्वागत केले.
स्वागतानंतर कोथळे गावच्या ओढ्यात सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर कावडी भेटीच्या पारंपारिक सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. कोल्हापूर संस्थाच्या कावडीने संत तेली भुतोजी महाराज कावडीला तीन प्रदक्षिणा घालून उराउरी भेट घेतली . खानोटा (ता दौंड) येथून ही कावड येत असते.कोल्हापूर संस्थानच्या गादीची मानाची कावड असून सन 1310 पासून या कावडीची परंपरा आहे .