

वळसंग : दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, विधवा महिला तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांतील लाभार्थ्यांना अद्याप पेन्शन प्राप्त झाली नसल्याच्या तक्रारी येताना दिसत आहेत. वारंवार सर्व्हर डाऊन असल्याचे तसेच शासनाकडून अद्याप रक्कम आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या योजनांतर्गत मिळणाऱ्या मासिक आर्थिक सहाय्यावर अनेक ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्ती, विधवा महिला आणि गरजू कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र संबंधित महिन्याची पेन्शन खात्यात जमा न झाल्याने घरखर्च, औषधोपचार, वीजबिल तसेच इतर आवश्यक गरजा भागविणे कठीण होत असल्याचे लाभार्थी सांगत आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध जिल्ह्यांतील लाभार्थ्यांनी वारंवार बँक खाती तपासूनही पेन्शन जमा झाली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे निधी वितरणात विलंब झाला आहे की, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, याबाबत शासनाने अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. लाभार्थ्यांच्या मते, पेन्शन ही त्यांच्यासाठी केवळ आर्थिक मदत नसून दैनंदिन जीवनाचा आधार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात वेळेवर निधी जमा होणे अत्यावशक आहे.
अनेकदा सर्व्हर डाऊन असणे किंवा जिल्हा व तालुकास्तरावरून याद्या अपलोड होण्यास विलंब होणे, निधी वेळेवर वितरित न होणे अशा अनेक बाबी आहेत, यामुळे लाभार्थी तालुक्यातील लांब लांबचे पल्ले गाठून, पैसे खर्च करून, कर्नाटक सीमेवर असलेले ग्रामीण भागातील नागरिक तहसीलदार कार्यालयात ठाण मांडून बसतात. मात्र त्यांच्या पदरी निराशाच येत आहे आणि रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.