

मोहोळ शहर : मोहोळ तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना शासकीय नियमानुसार पाच ब्रास वाळू मिळावी यासाठी, पंचायत समिती सदस्य व गटनेते संजीव खिलारे यांनी उचललेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सोमवार दि. 27 एप्रिल पासून वाळूचे वितरण होत आहे. महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीविरोधात खिलारे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
घरकुलांना वाळू द्या, अन्यथा पिढ्यानपिढ्या घरापासून वंचित राहिलेल्या व कायम उघड्यावर राहात असलेल्या घरकूल लाभार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी दि. 28 एप्रिल रोजी बार्शी दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांना प्रतीकात्मक ‘उघडे’ होऊन निवेदन देण्याची परवानगी द्यावी,” असा इशारा देण्यात आला होता. या मागणीची मुख्यमंत्री कार्यालयाने तत्काळ दखल घेत सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांना याप्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालकमंत्री गोरे यांची सोलापूर येथेे भेट घेतली. यावेळी पंचायत समिती मोहोळचे गटनेते संजीव खिलारे, नगरपरिषदेचे गटनेते व भाजपा तालुका अध्यक्ष सतीश काळे, उपसभापती राजकुमार पाटील उपस्थित होते. या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करून तातडीने कार्यवाहीची मागणी केली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवेदनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सोलापूर तसेच उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) पंढरपूर यांना त्वरित आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानुसार, मोहोळ तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
घरकूल लाभार्थ्यांना आजपासून वाळू वितरण
मोहोळ महसूल कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. 27 एप्रिलपासून देगाव येथील भोगावती नदी पात्रातून घरकूल लाभार्थ्यांना वाळू वितरणास प्रारंभ होणार आहे. तसेच भीमा व सिना नदी पात्रातील पाणी कमी होताच टप्प्याटप्प्याने घरकूल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटणार असल्याने घरकूल लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.