

सोलापूर : परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना सन्मानपूर्वक व अधिक दर्जेदार सेवा सुविधा देण्यासाठी उद्या एक मे या महाराष्ट्र दिनापासून आपली बस आपली सेवा हे अभियान सुरू करणार असून लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेसमध्ये हे अभियान कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बसमध्ये आता स्वच्छ गणवेशातील वाहक प्रवाशांना अभिवादन करत त्यांचे स्वागत करणार आहेत.
महामंडळाने प्रवासी संख्या वाढविण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक मे या महाराष्ट्र दिनापासून महामंडळ आपली बस आपली सेवा हे अभियान सुरू करणार आहे. प्रवाशी सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी चालक व वाहकांवर जबाबदाऱ्या दिल्या आहेत. बस ताब्यात घेताना बसच्या स्वच्छतेची खात्री करावी व ती सुटण्याच्या अगोदर 15 मिनिट ती फलाटावर मार्ग फलकासह थांबवावे लागेल. चालक-वाहकांना स्वच्छ गणवेशासह बिल्ला व नेमप्लेटसह वेळेत हजर राहणे बंधनकारक असून, बस सुटण्याच्या अगोदर सर्व प्रवाशांना तिकीट देतांना त्यांना अभिवादन करून बसचा मार्ग व बसची वेळापत्रकाची माहिती द्यावी लागेल.
प्रवाशांनी तक्रार केल्यास त्याचे विनाविलंब निराकरण करणे बंधनकारक असेल. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारले जाईल. बस रद्द झाल्यास तत्काळ तिकिटाचे पैसे परत द्यावे लागतील. बसच्या स्वच्छतेसाठी प्रवाशांचेही या दरम्यान सहकार्य घेण्यात येईल. ऑनलाइन प्रणालीने आरक्षण व स्मार्ट कार्ड वापराला प्रवाशांना प्रोत्साहित करण्यात येईल. महामंडळाचे आपली बस आपली सेवा या नव्या उपक्रमाने प्रवासी संख्या वाढून उत्पन्नात भरीव वाढ होणार असल्याचा विश्वास महामंडळाला आहे.