

पंढरपूर : महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याचा महायुतीने संकल्प केला आहे. कोकणात वाहून जाणारे 52 टीएमसी पाणी गोदावरी खोर्यात आणण्यासाठी सर्व धरणांच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
मंत्री विखे-पाटील हे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. विखे-पाटील म्हणाले की, माझे वडील स्व. बाळासाहेब विखे -पाटील व स्व. गणपतराव देशमुख यांनी अभ्यास करून नदीजोड प्रकल्पाचा आराखडा सादर केला होता. यावर सध्या काम सुरू आहे. या अंतर्गत सर्वात मोठे खोरे असणार्या गोदावरी खोर्यामध्ये कोकणात वाहून जाणारे 52 टीएमसी पाणी आणले जाणार आहे. यासाठी नदीजोड प्रकल्प राबविला जाणार आहे. वडिलांची स्वप्नपूर्ती करण्याची संधी मला मिळाली असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
राज्याचे मंत्रिमंडळ जाहीर झाले. परंतू,अद्याप पालकमंत्रिपदाचा वाद सुरू आहे. याचा परिणाम उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीवर झाल्याबाबत त्यांना प्रश्न केला असता विखे-पाटील म्हणाले की, पूर्वी कालवा समितीच्या बैठका पुण्यात व मुंबईमध्ये होत होत्या. मात्र, आता ही बैठक प्रथमच सोलापुरात घेण्यात आली आहे. तसेच उजनी धरणाचे 90 टक्के सिंचन सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे या जिल्ह्याला आपण न्याय देणार असल्याचे सांगितले.
महायुतीमध्ये खाते वाटपावरून कोणतीही नाराजी नसून सर्व एकदिलाने काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली आहे. याचा निःपक्षपणे तपास केला जाईल, असा दावा त्यांनी केला. विखे-पाटील हे महसूलमंत्री असताना त्यांनी स्वस्तात वाळूचे धोरण आणले होते. मात्र, ते राबविण्यात अपयश आले. याविषयी त्यांना प्रश्न केला असता, यामध्ये काम करणारी लॉबी प्रबळ असून त्यांच्या विरोधात आपण गरिबांना कमी दरात वाळू मिळावी म्हणून धोरण आणले होते. पण दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, आता महसूलमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे. आपण याबाबत पुन्हा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही विखे-पाटील यांनी दिली.