

सोलापूर : राज्यात ‘अल निनो’चा पावसावर प्रभाव पडल्याने उपलब्ध जल स्त्रोतातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या उपलब्ध पाण्याचे स्रोत राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, भूजल उपशावरही निर्बंध आले आहेत. पाणी स्रोतापासून ५०० मीटर परिसरात आता विहीर खोदाई करता येणार नाही. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरातील विहिरींमधून होणाऱ्या भूजल उपशावर तात्पुरती बंदी आणण्याबाबतही निर्णय होणार आहे.
राज्य शासनाने ऑक्टोबरनंतर पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचाही टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या भुजलाची पातळी खालावली आहे. परतीचा पावसाने दगा दिल्यास दुष्काळाची मोठी झळ सोसावी लागणार आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला संभाव्य टंचाईग्रस्त गावांची आणि वाड्यांची यादी तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. ही यादी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त अहवालासह जिल्हाधिकाऱ्यांना ऑक्टोबरअखेर सादर होणार आहे. दुष्काळाची पाहणी ५ ऑक्टोबरपासून केली जाणार आहेत.
टँकर पुरवठा हा शेवटचा उपाय
जिल्ह्यातील एखाद्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर टँकर देण्याअगोदर विंधन विहीर अधिग्रहणसह अन्य नऊ उपाय योजना कराव्या लागणार आहेत. यात खासगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित केली जाणार आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यात ५३१ गावांमध्ये ५७३ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्यासाठी २ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्चांचा नियोजन करण्यात आले आहे. टँकर हा शेवटचा पर्याय राहणार आहेत.
जिल्ह्यासाठी १८ कोटींचा टंचाई आराखडा
सोलापूर जिल्हा प्रशासनाने यंदाच्या वर्षी टंचाई निर्माण झाल्यास त्यावर उपाय म्हणून १८ कोटी ३४ लाख रुपयांचा आराखडा सादर केला आहे. यातून ६३० गावे आणि २ हजार ७०९ वाड्यांवर एकूण १ हजार ३२० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.