

रामेश्वर विभूते
सोलापूर : वीरशैव हा स्वतंत्र धर्म नसून ती हिंदू धर्माची शाखा आहे. सध्याला सर्वत्र जनगणना सुरू आहे. त्यासाठी वीरशैव बंधू-भगिनींनी जनगणनेवेळी धर्म या कॉलममध्ये हिंदू, तर जात या ठिकाणी वीरशैव लिंगायत आणि पोटजातीमध्ये आपली जी कोणतीही पोटजात असेल ती नमूद करावी, असे आवाहन काशीपीठाचे नूतन जगद्गुरू डॉ. श्री विश्वाराध्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींनी दैनिक ‘पुढारी’स खास मुलाखतीमध्ये केले. याप्रसंगी जगद्गुरू डॉ. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींचीही उपस्थिती होती.
वीरशैव लिंगायत हे सनातनीच आहेत. भारत म्हणजे हिंदुस्तान, यामुळे आपला धर्म हा हिंदू आहे आणि वीरशैव लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग आहे. हिंदुस्थानात राहणारे सर्वजण हिंदूच आहेत. वीरशैव लिंगायत ही वेगळी जात किंवा धर्म आहे असा कोणी अपप्रचार करत असेल तर त्याला बळी पडू नये. केवळ सोलापूर आणि महाराष्ट्रच नव्हे तर सबंध भारतामध्ये जिथे वीरशैव बांधव असतील त्यांनी जनगणनेत आपली नोंदणी हिंदू वीरशैव लिंगायत अशीच करावी, असे जगद्गुरू डॉ. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींनी स्पष्ट केले.
अंत्यसंस्कारात दफन आणि दहनही
मूलतः वीरशैवांमध्ये मृत्यूनंतर दफन केले जाते. असे असले तरी काही ठिकाणी जलसमाधी आणि चिताग्नीही दिला जातो. मृत व्यक्ती रोगाने बाधित असेल त्याच्या पार्थिवारवर अग्निसंस्कार केले जातात. गर्भवती स्त्रीचे निधन झाले तर तिच्या शरीराचा किंवा गर्भाचा जादूटोणा किंवा अन्य अघोरी कारणासाठी दुरुपयोग होऊ नये म्हणून तिच्या पार्थिवावर अग्निसंस्कार केले जातात, असे जगद्गुरू डॉ. श्री विश्वाराध्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींनी सांगितले.