Pandharpur Ashadhi Wari| वाढती पंढरीची वारी... : व्यवस्थापनाचा नवा आदर्श

यंदाची आषाढी वारी ठरली विक्रमी; २५ लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती.
Pandharpur Ashadhi Wari
Pandharpur Ashadhi Wari
Published on
Updated on

सतीश मोरे

पंढरपूर : यंदाची आषाढी वारी अनेक अर्थांनी वेगळी ठरली. महाराष्ट्र शासनाने सुमारे १८ ते २० लाख भाविकांचा अंदाज घेऊन नियोजन केले होते; मात्र पोलिसांच्या आकडेवारीनुसार यंदा २५ लाखांहून अधिक वारकरी पंढरपूरात दाखल झाले. हा आकडा पंढरीच्या वारीचे वाढते आकर्षण अधोरेखित करणारा आहे. त्याचवेळी वाढत्या गर्दीमुळे प्रशासनावर पडणारा ताणही स्पष्टपणे जाणवतो.

महसूल, पोलिस, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि आरोग्य विभाग या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यामुळे यंदाची वारी स्वच्छ, सुरक्षित आणि अधिक शिस्तबद्ध पार पडली. लाखो भाविकांची व्यवस्था करतानाही प्रशासनाने दाखविलेली कार्यक्षमता उल्लेखनीय म्हणावी लागेल.

पंढरीची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही; ती महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा जिवंत वारसा आहे. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा चार प्रमुख वार्‍या असल्या तरी आषाढी वारीचे महत्त्व आणि गर्दी सर्वाधिक असते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताबाई यांच्यासह राज्यभरातील शेकडो पालख्या विविध मार्गांनी पंढरपूरात दाखल होतात. याशिवाय हजारो गावांमधून निघणार्‍या लहान-मोठ्या दिंड्या आणि पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरी गाठतात.

गेल्या दहा वर्षांपासून मला वारीचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळत आहे. या काळात वारीत झालेला बदल अत्यंत सकारात्मक आहे. एकेकाळी अस्वच्छता, अपुर्‍या सुविधा आणि रोगराईची भीती हे वारीचे वास्तव होते. मात्र महाराष्ट्र शासनाने टप्प्याटप्प्याने स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, कचरा व्यवस्थापन आणि वैद्यकीय सेवा यामध्ये मोठी गुंतवणूक केल्याने वारीचे स्वरूप लक्षणीय बदलले आहे.

विशेषतः ’निर्मळ वारी’ उपक्रमामुळे उघड्यावर शौचाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हजारो तात्पुरती शौचालये उभारल्यामुळे चंद्रभागा नदीचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत झाली. काही वर्षांपूर्वी अस्वच्छतेमुळे चंद्रभागेत स्नान करण्याची इच्छाही होत नव्हती; मात्र यंदा नदीचे स्वच्छ, निर्मळ रूप पाहून स्नान करण्याचा आनंद घेता आला. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शासनाने केलेल्या प्रयत्नांचे हे प्रत्यक्ष फलित असल्याचे जाणवले.

यंदा चंद्रभागा घाट परिसरात कुठेही मोठ्या प्रमाणावर घाण दिसली नाही. त्यामागे पंढरपूर नगरपालिका, सोलापूर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांचा सातत्यपूर्ण समन्वय आहे. लाखो भाविक येऊनही स्वच्छता टिकवून ठेवणे ही मोठी कामगिरी आहे. वारीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक आणि गर्दीचे व्यवस्थापन. भाविकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने पंढरपूर शहरावर प्रचंड ताण येतो. तरीही यंदा पोलिसांनी वाहतुकीचे अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केले. शहरात कुठेही मोठी वाहतूक कोंडी झाली नाही. महाद्वार रोडसह मंदिर परिसरात लाखोंची गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

अनेक भाविकांना कळसदर्शन आणि विठ्ठल दर्शन शांततेत घेता आले. आज पंढरीची वारी जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक लोकचळवळींपैकी एक बनत आहे. वाढत्या भाविकसंख्येमुळे प्रशासनासमोरील आव्हानेही वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात पंढरपूरसाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा, विस्तीर्ण पार्किंग, आधुनिक वाहतूक व्यवस्था, नदी संवर्धन आणि पर्यावरणपूरक नियोजन यावर अधिक भर देणे गरजेचे ठरेल. वारी ही केवळ श्रद्धेचा उत्सव नाही; ती व्यवस्थापन, सामाजिक समन्वय, स्वच्छता आणि लोकसहभागाचा आदर्श आहे. भाविकांची वाढती संख्या पाहता भविष्यात यंदाचा विक्रमही मोडला जाईल, यात शंका नाही. मात्र त्या वाढत्या गर्दीचे नियोजनही त्याच वेगाने सक्षम करणे ही शासन आणि समाजाची सामूहिक जबाबदारी असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news