

कुर्डूवाडी : सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवास करणाऱ्या एका सोने व्यापाऱ्याची बॅग चोरीला गेल्याची घटना ६ डिसेंबर रोजी रात्री घडली होती. याबाबत सोने व्यापाऱ्याकडून कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाचे सूत्र वेगाने फिरत सीसीटीव्हीच्या आधारे तब्बल १० चोरांचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी आत्तापर्यंत पावणेदोन कोटींचे सोने हस्तगत केले आहे.
यात माढा तालुक्यातील बारलोणी,कव्हे,वडशिंगे या गावातील व परिसरातील काही चोरट्यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले. लोहमार्गच्या पोलीस पथकाने सहा महिन्यापासून वारंवार छापेमारी करत चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून नुकतेच तपासा दरम्यान कुर्डूवाडी शहरातील एका नामांकित सोने व्यापाऱ्याला दिलेले ५४८ ग्रॅम म्हणजे अर्धा किलो ४८ ग्रॅमचे दागिने परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. तर याबरोबरच मुंबई येथून ३०० ग्रॅम, शिलापूर येथून २५० ग्रॅम असे एकूण १ किलो १०० ग्रॅम सोने पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केले आहे .
फिर्यादी गोरेगाव मुंबई येथील अभय कुमार जैन हे सोन्याचे व्यापारी सोलापूर येथून सिद्धेश्वर एक्सप्रेसने प्रवास करीत असताना ही घटना घडली होती .कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई लोहमार्गचे पोलीस आयुक्त एम.के.राकेश कलासागर, पोलीस उपयुक्त प्रज्ञा येडगे यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या विशेष पथकाने चोरट्यांच्या संदर्भीय गावामध्ये वेळोवेळी छापे मारले.
त्यातून रमेश बाळू डिकोळे, फुलचंद उर्फ परमेश्वर गुंजाळ, धनराज उर्फ धन्या साहेबराव गुंजाळ, व पुणेकर उर्फ शिवण्या सिताराम डिकोळे वडशिंगे यांना पकडण्यात यश मिळाले. याआरोपींची वेळोवेळी न्यायालया कडून पोलीस कोठडी मागून सुमारे १ किलो १०० ग्रॅम सोने हस्तगत केले आहे.