सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
वारंवार रद्द होणार्या आणि उशिरा धावणार्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवासी वैतागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही त्रासदायक मालिका कधी थांबणार, असा प्रश्न रेल्वे प्रवासी विचारत आहेत. दरम्यान, दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून सोलापूर रेल्वे स्थानकाची ओळख आहे. येथून देशाच्या सर्वच भागात रेल्वेगाड्या जातात आणि येतात. येथून ठिक-ठिकाणी जाणार्या आणि येथे उतरणार्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. रेल्वेने प्रवास करणारी मंडळी अनेक दिवसांपूर्वीच आपले प्रवासाचे नियोजन करतात पण, असे असताना ऐनवेळी नियोजन केलेली गाडीच रद्द होत असेल किंवा उशिरा येत असेल तर प्रवासाचे नियोजन कोलमडते. गाडी रद्द झाल्यास दुसर्या गाडीने जातो म्हटले तर तिकिटाची समस्या उद्भवते.
गेल्या अनेक दिवसांपासून विकासकामांचे दाखले देऊन विविध मार्गावरच्या गाड्या रद्द करण्याचे प्रकार सुरू आहेत. रेल्वे प्रशासन रद्द करण्यात आलेल्या किंवा उशिरा पोहोचणार्या गाड्यांच्या संबंधाने परिपत्रक काढून मोकळे होतात. मात्र, महत्त्वाच्या कामासाठी, बैठकीसाठी तसेच इतर कामांसाठी अनेक दिवसांपूर्वीच नियोजन करून ठेवणार्या प्रवाशांना मात्र त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सोलापूरमधील अनेक विद्यार्थी, रुग्ण, कर्मचारी, शेतकरी, व्यापार्यांना पुणे, मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणी जावे लागते. व्यापारीही खरेदीच्या आणि देवाण-घेवाणीच्या निमित्ताने जातात. मात्र, गाडी रद्द होत असल्याने किंवा उशिराने धावत असल्याने त्यांना एकाच दिवसात पुणे, मुंबई इतर ठिकाणी जाऊन आणि येथून काम आटोपून परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना येथे मुक्काम करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. गाड्या रद्द होणे किंवा वेळेवर न पोहोचण्याची मालिका सुरूच असल्याने ती कधी थांबणार, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.
सोलापूरहून शासकीय कामानिमित्ताने पुणे, मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणी शासकीय अधिकारी, कर्मचार्यांची संख्याही मोठी आहे. कार्यालयीन वेळ लक्षात ठेवून ही मंडळी रेल्वेने अपडाऊन करण्यासाठी घरून आणि कार्यालयातून बाहेर पडतात. मात्र, उपरोक्त प्रकारामुळे त्यांचेही अनेकदा नियोजन बिघडते. कार्यालयात पोहोचण्यास त्यांना उशीर होतो. त्यामुळे कार्यालयीन कामावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे रेल्वेच्या लेटलतीफचा फटका त्यांनाही सहन करावा लागत आहे.