

पंढरपूर : पंढरपूर शहर व तालुक्यात बुधवारी रात्री वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. रात्री 12 नंतर आलेल्या पावसाने दिड ते दोन तास धूमाकुळ घातला आहे. यामुळे आंबा, द्राक्षे, डाळींब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काढणीला आलेला गहू, मका, ज्वारी, तुरी पिकांचे देखील भिजल्याने नुकसान झाले आहे. एकीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी कोलमडला आहे.
बुधवारी दिवसभर कडाक्याचे ऊन पडले तर सायंकाळी आकाशात ढग निर्माण होऊ लागले. बघता बघता आकाशात विजांचा कडकडाट सुरु झाला. रात्री 11 वाजता पुळूज, करकंब, कासेगाव, खर्डी या द्राक्षे पटट्यांच्या भागात जोरदार पाऊस झाला. तर रात्री 12 नंतर पंढरपूर परिसरात पावसाने दिड ते दोन तास धुमाकूळ घातला. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
द्राक्षे उत्पादकांबरोबर बेदाणा उत्पादकही हैराण झाले आहेत. वादळी वारा व पावसामुळे आंबा बागांमध्ये, आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचे खच पडले आहेत. पंढरपूर शहरातही जोरदार पाऊस पडल्याने रात्री रस्त्यांवरुन पाणी वाहत होते. तर रेल्वे बोगद्यातही पाणी साचले होते. रात्रीच्या वेळी पाऊस आल्याने नागरिकांचे हाल झाले नाहीत. मात्र, शेती पिके, फळबागा तसेच जनावरांचे हाल झाले. गुरुवारी रात्री देखील ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी धास्तावले.