

पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयात आंदोलन केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याला धार दिल्याने आंदोलन तीव्र झाले. आंदोलक विद्यार्थ्यांच्या घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणूून गेला. आंदोलनाची तीव्रता पाहता महाविद्यालयाकडून आंदोलकांच्या अटी मान्य केल्याचे घोषित केले.
या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ओंकार माळी, ऋषिकेश सातपुते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयातील (स्वेरी) विद्यार्थ्यांकडून अनैतिकपणे विविध विषयाकरीता दंड आकारण्यात येत आहे. तो आकारु नये, आकारलेला दंड परत द्यावा. विद्यार्थ्यांना नियमित शासकीय व साप्ताहिक सुट्ट्या दिल्या जात नाहीत, त्या द्याव्यात.
तसेच महविद्यालयाच्या कमिटीमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश करावा. काही शिक्षकांची विद्यार्थ्यांशी वर्तणूक ठिक नाही, त्या शिक्षकांना समज द्यावी. नाईट स्टडी चांगला उपक्रम आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून दंड आकारणी करु नये. महाविद्यालयाचे वार्षिक वेळापत्रक निश्चित असावे. वार्षिक फी स्ट्रक्चर निश्चित असावे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ केली आहे. मात्र महाविद्यालयाने अद्याप त्याची अंमलबजावणी केली नाही. यासह 17 मागण्या करण्यात आल्या आहेत. दिवसभर सुरु असलेल्या आंदोलनामुळे महाविद्यालयाचा परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता.