

पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या कालावधीत पंढरपूर शहरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी दि.१५ जुलै ते २९ जुलै या कालावधीमध्ये मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्रीवर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी बंदी आदेश जारी केले आहेत.
आषाढी शुध्द एकादशी सोहळा २५ जुलै रोजी साजरा होत आहे. यात्रा कालावधी दि.१५ जुलै ते २९ जुलै असा आहे. या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी इथापे यांनी सदर आदेश जारी केले आहेत. करकंब व परिसरात मांस, मटण विक्रीस मनाई केली आहे. आषाढी यात्रेसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून मानाच्या व महत्त्वाच्या पालख्या करकंब (ता.पंढरपूर) येथे मुक्काम करीत असतात.
याठिकाणी लाखो भाविक करकंबसह आसपासच्या गावात मुक्कामास असतात. विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून तसेच भाविकांकडून मांस, मटण विक्रीस बंदी घालावी, अशी मागणी होती. त्या अनुषंगाने करकंब व पांढरेवाडी, व्होळे, देवडे, खेडभोसे येथे दिनांक २० जुलै ते २५ जुलै या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
आदेश जारी
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी यात्रेनिमित्त लाखो भाविक येतात. या भाविकांना उपवासाचे पदार्थ आवश्यक असतात. मांस, मटण, मासे वर्ज्य असतात. भाविकांच्या भावनांचा विचार करुन मांस, मटण, मासे विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी इथापे यांनी सदर आदेश जारी केले आहेत.