

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदी व पालखी मार्गावर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. यंदा पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याचे स्वतःचे महिलांचे बचाव पथक वारीत सहभागी होणार आहे. भाविकांच्या मदतीला १८० आपदा मित्र तर १७ बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन व्यवस्थेकरिता ६ अग्निशमन वाहने आणि एक रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आली आहे. रेस्क्यू व्हॅनचे इनचार्ज पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संभाजी कारले आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या होड्यांसाठी १०४५ लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता जेडे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ११, पुणे जिल्ह्यातील २ आणि एनडीआरएफच्या ४ अशा एकूण १७ रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. रेस्क्यू बोटीसाठी १०० लाईफ जॅकेट, ३० लाईफ रिंग, ९ वॉकी-टॉकी, ५ मेगाफोन, ४ इन्फ्लेटेबल टेंट, ६ मिमी स्टॅटिक रेस्क्यू रोप, ५ टॉर्च, २ लेजर पॉइंटर व २ लाईट बॅटन अशी सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. या संपूर्ण यंत्रणेचे इनचार्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले हे आहेत.