

पंढरपूर : सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या अतिवृष्टीचा फटका पंढरपूर शहरातील रस्त्यांना देखील बसला आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभुमिवर अडीच कोटी रुपये खर्चुन पंढरपूर शहारातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. कार्तिकी यात्रेत येणाऱ्या वारकरी, भाविकांसाठी प्रशासनाकडून सहा लाख पाणी बाटल्या तर 6 लाख ज्युस बाटली वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
पंढरपूर कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभुमिवर भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलीस उपाधिक्षक प्रशांत डगळे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसिलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.
कार्तिकी यात्रेत करण्यात आलेल्या प्रशासकीय उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, कार्तिक यात्रेला किमान 10 ते 12 लाख भाविक येतील, असा अंदाज धरुन सेवासुविधा पुरवण्यात येत आहेत. पंढरपूर शहर तसेच चंद्रभागा वाळवंट, भक्तीसागर येथे स्वच्छतेचे काम पुर्ण झालेले आहे. तर यात्रा काळातही स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. अडीच कोटी रुपये खुर्चन दोन दिवसात शहरातील रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात्रा काळात मोकाट जनावरे रस्त्यांवर दिसणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येणार आहे. पावसाचे दिवस लक्षात घेता दर्शन रांगेत बारा ठिकाणी दर्शन शेड उभारण्यात आले आहेत. दर्शन रांगेत भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे म्हणून व्हिआयपी दर्शन बंद ठेवण्यात येत आहे.
आषाढी यात्रेच्या धर्तीवर शहरातील मुख्य रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. आणि यात्रेला येणाऱ्या भाविकांना सहा लाख पाणी बाटली व सहा लाख ज्युस बॉटली वाटप करण्यात येणार आहे.